भाजपाच्या ” गाव तिथे उद्योजक ” संकल्पनेला वेग.

वसंत खडसे
दैनिक लोकतंत्र
वाशिम : राज्यातील सांगली जिल्ह्यात येत असलेल्या मिरज तालुक्यातील सावळवाडी या दोन हजार लोकसंख्येच्या छोट्याशा गावातून सुरू झालेली रवींद्र माणगावे यांची वाटचाल आज राज्याच्या राजकीय व उद्योजकीय विश्वात एक महत्त्वपूर्ण टप्पा पार करत भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेशाने नव्या अध्यायात दाखल झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. उद्योगक्षेत्रातील मान्यवर संतोष मंडलेचा यांच्या उपस्थितीने हा क्षण अधिक अर्थपूर्ण ठरला. या सोहळ्यास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपा प्रदेश महामंत्री राजेश पांडे, मनसे चित्रपट सेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रमेश परदेशी (पिट्याभाई), पुणे मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष चेतन धोत्रे, तसेच आनंद कुंदूर, करण सुरवसे, कृणाल कडू, ॲड. अक्षय वाडकर, गजेंद्र परदेशी, ओंकार किराड, अनुराग गड्डम, अनुराग पाटील, प्रसाद भोसले आणि ऋतिक ननावरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राज्यात ‘उद्योगविकास’, ‘ग्रामविकास’ आणि ‘तरुण उद्योजकता’ या तीनही क्षेत्रांना मिळालेल्या नवसंजीवनीमुळे रवींद्र माणगावे प्रखरपणे प्रेरित झाले. विशेष म्हणजे, “गाव तिथे उद्योजक” हा त्यांचा मुख्य ध्यास—गावागावात उद्योगनिर्मिती घडवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणे—याला राजकीय व्यासपीठावरून वेग मिळावा, ही भावना त्यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन त्यांच्या नेतृत्वाखाली हे स्वप्न अधिक भक्कम करण्याचा संकल्प त्यांनी सोहळ्यात व्यक्त केला.
शेतकरी कुटुंबाच्या मातीतून आलेले रवींद्र माणगावे बालपणापासून ग्रामीण प्रश्नांच्या आणि सामान्य माणसाच्या संघर्षांच्या मुळाशी गेले. लोकसेवेची प्रेरणा आईकडून मिळाल्याने वयाच्या केवळ 21व्या वर्षी ते सरपंच म्हणून निवडून आले आणि नेतृत्वाचे पहिले पाऊल भक्कम रित्या रोवले. तेव्हापासून सामाजिक कार्य, लोकसंपर्क, आणि नागरिकांच्या कल्याणासाठी काम करण्याची त्यांची धडाडी सातत्याने वाढतच गेली.
आज महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष म्हणून, राज्यातील हजारो नवउद्योजक घडविण्याचे मोठे ध्येय ते पुढे नेत आहेत. पण आता, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून हे ध्येय राज्यव्यापी “गाव तिथे उद्योजक” आंदोलन बनवून पुढे नेण्याचा दृढ निश्चय त्यांनी केला आहे. ग्रामीण युवकांनी उद्योगक्षेत्रात उतरावे, लघुउद्योग फुलावेत, शेतीपूरक उद्योग वाढावेत आणि प्रत्येक गाव उद्योजकतेचे केंद्र बनावे—ही त्यांची जीवनदृष्टी आहे.
रवींद्र माणगावे यांचा भाजपमध्ये प्रवेश म्हणजे पक्षाला एक समर्पित, उद्योजकता-विकासाभिमुख, लोकांशी जोडलेला आणि कामावर विश्वास ठेवणारा नेतृत्वगुणी कार्यकर्ता मिळणे होय. त्यांच्या समावेशामुळे ग्रामीण उद्योजकतेला गती, उद्योगवाढीस चालना आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला नवा आयाम लाभेल, अशी भावना पक्ष नेतृत्वाने व्यक्त केली आहे.
